www.upkarmarathi.com
mahatma gandhi information in marathi


information about mahatma gandhi
 information about mahatma gandhi 

महात्मा गांधी
 | information about mahatma gandhi 


            | information of mahatma gandhi, गांधीजींना भारतातले सारे लोक बापू म्हणतात. बापू  म्हणजे वडील. भारतातल्या अर्धपोटी, अर्धनग्न लोकांमध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण करण्याची कामगिरी  गांधीजींनी केली.स्वातंत्र लढ्यात त्यांनी गरीबातला गरिबाला, दुबळ्यातील दुबळ्याला सहभागी होण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या मधली भीती नाहीशी केली. पारतंत्र, दारिद्र्य यामुळे निर्माण झालेली लाचारी नष्ट केली .आपण  सारे भारतीय आहोत याचा अभिमान लोकांमध्ये निर्माण केला. भारताच्या जनजीवनाशी  ,दारिद्र्याशी आणि लोकांच्या सुखदुःखांशी  बापूजी पूर्णपणे समरस झालेले होते .

                           |information about mahatma gandhi

        गांधीजींचा जन्म गुजरात मधल्या पोरबंदर या गावी 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला .त्यांच्या घरचे वातावरण सुसंस्कृत होते. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर  संस्थानचे दिवाण होते .आईचे नाव पुतळीबाई .आईवर त्यांचे विलक्षण प्रेम आणि श्रद्धा होती.गांधीजींना भारतीय स्त्रियांची सुखदुःखे कळू शकली याचे सारे श्रेय गांधीजी आपल्या आईला देतात .गांधीजींची आई हा भारतीय स्त्रिया आणि गांधीजी यांच्या मधील एक महत्त्वाचा भावनिक दुवा होता.

   शालेय शिक्षण संपवून गांधीजी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. बॅरिस्टर होऊन परत आले .एका अशिलाची केस चालवण्यासाठी 1893 साली, बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी, वय वर्ष 24 हे दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यांच्या जीवनात प्रचंड परिवर्तन घडवून आणणाऱ्या  प्रवासाची सुरुवात झाली.

     दक्षिण आफ्रिका आणि भारत हे त्याकाळी ब्रिटिश साम्राज्याचे भाग होते .या दोन्ही देशांमधील जनता ही एकच साम्राज्याची प्रजा तेव्हा .या प्रजेचे हक्क सारखेच असणार ,निदान असायला हवेत असे इंग्लंडमध्ये कायदा शिकलेल्या गांधीजींना वाटत होते. परंतु गोऱ्या लोकांचा वर्णद्वेष हा किती भयंकर असतो ,आपण राज्यकर्ते आहोत, गोरे आहोत, आपला वंश श्रेष्ठ आहे .अशा अहंकाराने पछाडलेले इंग्रज लोक भारतीयांसारख्या कृष्णवर्णीयांचा किती द्वेष करतात? याचा प्रत्यक्ष अनुभव गांधीजींना आला .

      दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेने प्रवास करत असताना पहिल्या वर्गाचे तिकीट जवळ असूनही गांधीजींना डब्यातून धक्के मारून बाहेर काढण्यात आले. कारण काय तर ते काळे होते .म्हणजे पहिल्या वर्गातून प्रवास करण्याचा अधिकार फक्त गोऱ्या लोकांना .गांधीजींनी या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निर्धार केला एक ज्वालामुखी जागा झाला.

     गांधीजींना आलेला अनुभव दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्याच गोरेतरांना येतसे . त्याविरुद्ध त्यांच्या मनात संतापही उसळे. परंतु या अन्यायाचा प्रतिकार कसा करावा? हे त्यांना कळत नव्हते. दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांचे  सरकार एवढे सामर्थ्यवान ,त्यांच्याजवळ फौजफाटा, दारुगोळा आणि आपण तर निशस्त्र. कसा लढा द्यायचा?

        गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना एकत्र केले. "नाताळ हिंदी काँग्रेस" ही संघटना स्थापली. त्यांची एकजूट केली .त्यांना निर्भय बनवले. आणि त्यांच्या हाती एक अमोघ शस्त्र दिले.

     या लोक विलक्षण शस्त्राचे नाव होते सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे जे सत्य आहे ,अशी आपली खात्री असेल त्याचा कोणाच्याही विरोधाला न जुमानता पुरस्कार करणे. गांधीजींचे असे सांगणे होते की, विरोधकांचा प्रतिकार सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने अहिंसक मार्गानेच केला पाहिजे .कारण हिंसेपेक्षा ते प्रभावी ठरतात. याचा पराभव अधिक हिंसा वापरून करता येतो ,अहिंसेचा पराभव होणे शक्य नसते .हिंसेतुन हिंसा आणि द्वेषातून द्वेषच वाढतो .म्हणून विरोधकांना प्रेमानेच जिंकण्याचा प्रयत्न सत्याग्रहीने केला पाहिजे .जे प्रेमामुळे साधते ते कायम टिकते.

          प्रत्येक माणसाच्या मनात चांगुलपणा असतोच. काही वेळा तो हिंसेच्या व संतापाच्या आड दडलेला असतो .प्रेम, अहिंसेच्या मार्गांनी या चांगुलपणाला जागवता येते. हे मार्ग कधीकधी खूप कष्टाचे ठरतात .पण अंतिम विजय सत्याचा होणे अटळ असल्यामुळे हे कष्ट ,हे क्लेश सोसून  देखील या मार्गावर चिवटपणे चालत राहण्याचा सल्ला गांधीजींनी सत्याग्रहींना दिलेला आहे.
    
      गांधीजींच्या मते सत्याग्रहाचे शस्त्रच असे असते ,की जे वापरणाऱ्याचे  मन शुद्ध करते. आणि विरोधकांच्या माणूसपणाला जाग आणते .त्यांचे हृदय परिवर्तन करते .दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी हे सत्याग्रहाचे शस्त्र वापरले . सुरुवातीला सरकारने दंडेली केली ,अत्याचार केले. पण शेवटी सरकार नमले. भारतीयांसाठी  नोंदणी करणे, ओळखपत्र वापरणे असे अपमानास्पद व अन्यायकारक कायदे सरकारने मागे घेतले. सत्याग्रहाचे अस्त्र तावून सुलाखून निघाले आणि यशस्वी झाले. वीस एक वर्ष गांधीजी आफ्रिकेत होते.

        1915 मध्ये गांधीजी भारतात परत आले ते सत्याग्रहाचे सेनानी म्हणून. लोक त्यांना आता महात्मा गांधी म्हणू लागले होते .गांधीजी भारतात परत आले तेव्हा भारतीय राष्ट्रीय सभेच्या कामात थोडा थंडपणा आलेला होता .राष्ट्रीय सभेची सूत्र नेमस्तांकडे होती . नेमस्तांचे पुढारी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांविषयी गांधीजींच्या मनात नितांत आदर होता. जे नीतिनियम, जी सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आपण खाजगी जीवनात आदर्श मानतो तीच राजकारणातही पाळली गेली पाहिजेत .यावर गोखले यांचा कटाक्ष होता .गांधीजींना हा विचार पूर्णपणे मान्य होता. गांधीजींनी गोखल्यांना आपले गुरु मानले. गांधीजी म्हणत ,की जीवनाचे ध्येय जितके महत्त्वाचे तितकेच महत्त्व ते ध्येय साधनेच्या मार्गानाही असते .आपले ध्येय उच्च असले पाहिजे आणि आपली साधन शुद्ध आणि पवित्र असली पाहिजेत.

     गोखले यांच्या सांगण्यावरून एक वर्ष गांधीजींनी भारतभर प्रवास केला. आपल्या देशाचे सौंदर्य पाहिले आणि त्याबरोबरच जनतेचे भकास दारिद्र्यही त्यांनी पाहिले.  लोकांना खायला अन्न नाही ,लाज राखण्यापुरताही वस्त्र नाहीत. गांधीजींचे रुदय कळवळले. हे दुःख जर दूर व्हायचे असेल तर इथून परकीय सत्ता गेली पाहिजे . ती घालवण्यासाठी झगडावे लागेल . त्यासाठी सामान्य माणसांना संघटीत करावे लागेल.

   गांधीजींनी चंपारण्यातल्या शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा प्रश्न तडीस लावण्याचे ठरवले. निळीच्या उत्पन्नासाठी युरोपीय मळेवाले, हिन्दी सावकार व्यापारी हे शेतकऱ्यांचे शोषण करत . सरकारकडे दाद फिर्याद मागण्यात अर्थच नव्हता. गेली अनेक वर्ष बिहार मधला शेतकरी असा नाडला जात होता .गांधीजींनी यावर कठोर हल्ला करायचे ठरवले. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी चंपारण्य सत्याग्रह केला .अखेर सरकारला नमते घेणे भाग पडले .भारतातला पहिला सत्याग्रह असा यशस्वी झाला.

   चंपारण्यातल्या सत्याग्रहामुळे देशातील वातावरणच बदलून गेले. या वातावरणाचा अंदाज इंग्रज सरकारला आलाच नाही. पहिले महायुद्ध संपल्यावर ब्रिटिश सरकारने अमानुष दडपशाही सुरू केली. रौलेट कायद्यासारखे, माणुसकीला काळिमा फासणारे कायदे पास केले. पंजाबात जालियनवाला बागेत हजारो निष्पाप भारतीयांची क्रूर हत्या केली . गांधीजींनी याविरुद्ध सत्याग्रह करण्याचे ठरवले .राष्ट्रीय सभेने लढ्याची सगळी सूत्रे गांधीजींच्या हाती दिली.

मुस्लिमांचा धर्मप्रमुख खलिफा यांच्यावर इंग्रजांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात आक्रमण केले होते. त्याविरुद्ध भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली , तीला खिलाफत चळवळ असं  म्हणतात . या वेळी गांधिंनी खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला.

     गांधीजींनी सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारले. या आंदोलनाने सारा देश पेटून उठला. हे आंदोलन ऐन भरात असताना उत्तर प्रदेशमधील चौरीचौरा या गावी रागाच्या भरात जमावाने हिंसा केली. महात्मा गांधीजींनी या हिंसेला आपणच जबाबदार आहोत .अशी नैतिक जबाबदारी स्वीकारली. अनेक लोकांचा रोष  पत्करून गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले.

   ब्रिटिश सरकारने गांधीजींना कैद केले आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांच्यावर ती खटला भरला. गांधीजींनी आरोप मान्य केले. ते म्हणाले ,"जुलमी अन्याय कायद्यांचा भंग करणे ,हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. मी ते बजावत आहे . मला जर सोडलं, तर मी पुन्हा तेच करीन."

      कोर्टाने गांधीजींना सहा वर्षांची शिक्षा दिली .1927 साली भारतात आलेल्या सायमन कमिशनवर राष्ट्रीय सभेने बहिष्कार टाकला होता. देशात चैतन्याचे वारे वाहू लागले. काहीतरी अघटित घडणार असे सगळ्यांनाच वाटत होते .आणि एक दिवस अचानक बातमी आली.

 गांधीजी मिठाचा सत्याग्रह करणार!

      मार्च 1930 मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा काढली. साबरमती आश्रमातून ते निघाले .385 किलोमीटर पदयात्रा करून दांडी येथे पोहोचले. तिथे जाहीरपणे त्यांनी मिठाचा कायदा तोडला. आश्रमातून निघतांना त्यांच्याबरोबर 78 सहकारी होते. दांडीच्या सागरतीरावर पोहोचेपर्यंत हजारो जण यामध्ये सामील झाले.

     साऱ्या देशभर मिठाचा कायदा मोडण्याचे सत्याग्रह सुरु झाले. जिथे मिठागरे नव्हती, समुद्रकिनारा नव्हता ,तिथे जंगल विषयक कायदे मोडण्यात आले. या सत्याग्रहात देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी, कामगार ,आदिवासी अशा सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला. सुरुवातीला अगदी छोटी वाटणारी ठिणगी आता वणव्यामध्ये रूपांतरित झाली .सारा देश या वणव्याने व्यापून टाकला.
  
     इकडे देश पेटून उठला होता. सरकारने अमानुष दडपशाही करायला सुरुवात केली. हजारो लोकांना कैद केले. गोळीबार ,लाठीहल्ला केले सत्याग्रहीनी  सगळं सहन केलं. लाठीचा तडाखा बसत असताना त्यांच्या तोंडी घोषणा होत्या, भारत माता की जय ,महात्मा गांधी की जय.

  गांधीजींना अटक झाली परंतु सत्याग्रहाची तीव्रता कमी होत नव्हती .तेव्हा सरकारने गांधीजींशी  सामोपचाराची बोलणी केली .सत्याग्रहींची मुक्तता केली . गांधीजी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेला हजर राहिले.

   गांधीजींचा भर राष्ट्र घडवण्या वर होता. या राष्ट्र घडवण्याच्या कार्यक्रमाला ते विधायक कार्यक्रम म्हणत.   या विधायक कार्यक्रमाचे प्रतीक होते चरखा . चरख्यावर सूतकताई करून ग्रामोद्योगाला चालना देणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते.

  चरखा हे अत्यंत साधे यंत्र. कोणालाही वापरता येण्याजोगे .घरच्याघरी स्त्रिया-पुरुष ,मुलांनाही चालवता येण्याजोगे. गरीबांसाठी उत्पन्नाचे साधन होऊ शकेल असे हे यंत्र .खेडोपाडी घराघरांमधून असंख्य चरखे  फिरू लागले .खादी हे राष्ट्रभक्तीचे आणि देश प्रेमाचे लक्षण झाले .खादी आणि ग्रामोद्योग हे आर्थिक स्वातंत्र्याचे दोन आधारस्तंभ झाले. 

    खरा भारत हा खेड्यांमध्ये आहे . अशी गांधीजींची स्पष्ट धारणा होती. त्यांच्या सगळ्याच विचारांचा केंद्रबिंदू गरिबातील गरीब माणूस असे. सगळ्या योजना आखताना या शेवटच्या माणसाला डोळ्यांसमोर ठेवा. त्यांचे हित होईल असे पहा. असे गांधीजी आवर्जून सांगत . सर्वोदय हे त्यांच्या विचारांचे सार होते.

     दलितांचा प्रश्न गांधीजींना अत्यंत बेचैन करणारा एक महत्त्वाचा प्रश्न होता .अस्पृश्यता हा  राष्ट्रावरचा आणि मानवतेवरचा दुष्ट कलंक आहे, असे गांधीजींचे मत होते .तो नष्ट करण्यासाठी त्यांनी साऱ्या आयुष्यभर झगडा दिला. अस्पृश्यांना ते हरिजन म्हणत. या देशाची प्रचंड शक्ती जातीपातीच्या भ्रामक समजुतीत  वाया जात आहे, याचे त्यांना दुःख होत असे. भारतीय समाजाचे हे दुभंगलेपण नष्ट होणे आणि हा समाज एकसंध होणे हा गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नाचा एक भाग होता.

    1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं. भारतातील इंग्रज सरकारच्या युद्धविषयक धोरणाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला .हा सत्याग्रह समूहाने करायचा नसून प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे करायचा होता.  महात्मा  गांधीजींनी श्री . आचार्य विनोबा भावे यांची पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली होती.
      
       8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत  भरलेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात गांधीजींनी चले जाव ची घोषणा केली .त्यांनी इंग्रजांना तात्काळ भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा आदेश दिला .जर इंग्रज बऱ्या बोलाने गेले नाहीत तर ते जाईपर्यंत संघर्ष करण्याची घोषणा केली.  भारतीय जनतेला त्यांनी एकच संदेश दिला" करेंगे या मरेंगे"

   या संदेशाने क्रांतीच्या ज्वाला भडकल्या सरकारने गांधीजी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा व सचिव महादेवभाई देसाई यांना तात्काळ अटक केली परंतु गांधीजींनी प्रत्येकाला अहिंसात्मक मार्गाने लढा चालू ठेवण्याचा आदेश दिलेला होता त्याप्रमाणे लढा चालूच राहिला.

    1945 साली  महायुद्ध संपले. भारतीय स्वातंत्र्याविषयी सहानुभूती असणाऱ्या मजूर पक्षाचे सरकार इंग्लंडमध्ये सत्तेवर आले . स्वातंत्र्यप्राप्तीच्या वाटाघाटींना अधिकच वेग आला .मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानचा आग्रह धरला. काँग्रेसवर दडपण आणण्यासाठी जागोजागी जातीय दंगली घडवून आणल्या.

                  बंगालमधल्या नोआखाली भागात तर दंगलींचा आगडोंब उसळला होता. निष्पाप ,निरपराध लोकांची हत्या होत होती. गरीबांची भांडीकुंडी ,गाडगी मडकी, झोपड्या यांचा सर्रास विध्वंस होत होता. या दुखिताना कोणीही वाली नव्हता .धर्मांधतेने पेटलेल्या त्या वणव्यात गांधीजी एकटेच गेले .साऱ्या वाटाघाटी पेक्षा जास्त महत्त्वाचं काम त्यांना करायचे होते. दुःखितांचे अश्रू पुसायचे होते. त्यांना आधार द्यायचा होता, त्यांच्यात पुन्हा विश्वास निर्माण करायचा होता.

  ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी भारताचा हा राष्ट्रपिता दीन दुःखितांचे अश्रू पुसत होता.

    गांधीजींच्या मनाविरूद्ध देशाची फाळणी झाली. फाळणीनंतर लाखो निर्वासित दिल्लीला आले .त्यांचे सर्वस्व गेले होते. भविष्याविषयी अंधार असलेले हे निर्वासित दिल्लीत मोठ्या संख्येने गोळा झाले. दिल्ली सूडाने पेटून उठली .प्रचंड दंगली उसळल्या. गांधीजी कलकत्त्याहून दिल्लीला आले आणि रोज सायंप्रार्थनेतून ते सांगू लागले ,

झाले गेले सगळे विसरून जा .आता तरी आपण शांततेने एकत्र राहूया.

       पण सुडाने पेटलेल्या अविवेकी मनापर्यंत त्यांचे शब्द पोहोचलेच नव्हते.30 जानेवारी 1948 रोजी गांधीजी आपल्या सायप्रार्थनेला जात असताना अशाच एका अविवेकी तरुणाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. "हे राम" असे म्हणत गांधीजी कोसळले. आणि एका तेजोमय जीवनाचा अंत झाला.
    
 त्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरू दुःखाने बेभान झालेल्या   राष्ट्राला उद्देशून म्हणाले ,
      या देशातून आपल्या आयुष्यातून आज सगळा प्रकाश निघून गेला आहे. सगळीकडे निबिड अंधार पसरला आहे.

  ही व्यथा फक्त नेहरूंची नव्हती, तर संपूर्ण भारताची होती.

    गांधीजींची थोरवी सांगताना प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाले,
 असा महान ऋषी युगा युगात एकदाच होतो. हाडामासाचा असा माणूस या भुतलावर प्रत्यक्ष वावरला, असं पुढच्या पिढ्यांना सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही.
  

गांधीजींनी लिहिलेली पुस्तके

नैतिक धर्म 
माझ्या स्वप्नांचा भारत 
गांधी विचार दर्शन: हरिजन
गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा 
गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दात
इंडियन होम रुल (हिंद स्वराज्य)



ही माहिती लोक खालील नावाने शोधतात .

महात्मा गांधी भाषण 
महात्मा गांधी पुण्यतिथी 
महात्मा गांधी भाषण मराठी
महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती 
महात्मा गांधी निबंध मराठी
महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती मराठीत 
महात्मा गांधी विचार मराठी 
महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द 
अहिंसा व स्वातंत्र्य लढा निबंध
महात्मा गांधी यांचे सामाजिक कार्य मराठी
महात्मा गांधी पुस्तके
गांधी प्रणित जीवन कौशल्य आधारित शिक्षण पद्धती

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने